नवी दिल्ली : भारताचा अग्रमानांकित शटलर किदांबी श्रीकांतने चायना ओपननंतर आता हाँगकाँग सुपर सीरिजमधून नाव मागे घेतले आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या दुबई सुपर सीरिजपूर्वी त्याला पूर्णपणे तंदुरूस्त व्हायचे असल्याने त्याने हा निर्णय घेतला.
श्रीकांत स्नायुच्या दुखापतीमुळे डॉक्टरांच्या सांगण्यावरून चायना ओपन सुपर सीरिजमधून बाजूला झाला होता. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील श्रीकांतला डेस्टिनेशन दुबई रँकिंगमध्ये पहिल्या स्थान आहे व भारताला त्याच्याकडून खूपच अपेक्षा आहेत. या सत्रात त्याने पाच स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे तर चारवेळा त्याने किताबावर कब्जा केला आहे.
अन्य भारतीय समीर वर्मानेही खांद्याच्या दुखण्यामुळे या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अजय जयरामनेही यापूर्वीच स्नायुच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.