बंगळुरू :
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने आज सांगितले, भारतीय हॉकी संघ ११ ऑक्टोबरपासून आशिया कप २०१७मध्ये जपानविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करण्यासाठी उतरणार तेव्हा भारताचे लक्ष्य आशियातील पहिले स्थान अबाधित राखण्याकडे असेल. या स्पर्धेत भारत पहिल्या क्रमांकाचा संघ म्हणून सहभागी होत आहे व सुपर ४मध्ये स्थान मिळवण्यासाठी ‘ए' गटात भारताला जपान, बांगलादेश आणि पाकिस्तानशी सामना करावा लागेल.
हॉकी इंडियाचे ‘हाय पफॉर्मंस' निदेशक डेव्हिड जान आणि नव नियुक्त मुख्य प्रशिक्षक मारिन शुआर्ड यांच्या देखरेखीखाली एका आठवड्याच्या राष्ट्रीय शिबिरानंतर १८ सदस्यांचा संघ स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे. संघ ढाकाला रवाना होण्यापूर्वी मनप्रीतने सांगितले, आम्हाला माहीत आहे या स्पर्धेत सहभागी होणारा आमचा संघ क्रमवारीत सर्वांत वर आहे व आमचे लक्ष्य पहिला क्रमांक टिकवण्यावरच असणार आहे.
पुढे मनप्रीतने सांगितले, या स्पर्धेत भारत विजय मिळवण्याच्या इराद्यानेच उतरणार आहे व त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. मनप्रीतने सांगितले, आम्हाला वाटते की, जपान, बांगलादेश आणि पाकिस्तान कोणाशीही खेळताना आम्हाला चांगला खेळ करावाच लागणार.
या वर्षीच्या जुलै महिन्यात विश्व हॉकी लीग सेमीफायनल्समध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारत ‘ए' गटातील तिसऱ्या सामन्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पुन्हा लढणार. भारताचा पहिला सामना जपानशी ११ ऑक्टोबर रोजी होईल.