अटक केलेल्या संशयितांचा जामीन फेटाळला


04th October 2017, 03:51 am

पणजी : प्रतिनिधी
कांपाल येथील परेड मैदानाजवळ मागील महिन्यात एका कामगाराचा खून झाला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती. यातील न्यायालयीन कोठडीत असलेले मंजुनाथ शिवशरण कोळी आणि राजकुमार जयगुडी या दोघांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
कांपाल येथील परेड मैदानाजवळ ५ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वा. तिघा अनोळखी व्यक्तींनी त्या परिसरात राहत असलेल्या गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील कामगार मनोज यादव यांना बेदम मारहाण केली होती. तसेच त्यावेळी यादव यांच्या मदतीला धावून आलेल्या तथा तक्रारदार आकाश दास यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यलयात उपचार सुरू असताना त्याच दिवशी सकाळी ७.३० वा. यादवचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात‍ाविरोधात कलम ३०२ नुसार खुनाचा तर तक्रारदार दास यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता. चौकशी दरम्यान पोलिसांनी मंजुनाथ शिवशरण कोळी, राजकुमार जयगुडी, तिसरा संशयित अनिकेत नाईक यांना अटक केली होती. यातील अनिकेत नाईक याची जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. तर संशयित मंजुनाथ आणि राजकुमार या दोघांनी प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज केला होता. खून प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने प्रथमवर्ग न्यायालयाने त्या दोघांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्या दोघांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.