बोअरवेलचे खड्डे ठरताहेत मृत्यूचा सापळा

राज्यरंग : तामिळनाडू

Story: अजय लाड |
01st November 2019, 06:00 am

दिवाळीच्या धामधुमीत तामिळनाडूतील एक घटना मात्र, सर्वांच्याच जीवाला चटका लावून गेली. सर्वजण दीपावलीचे अभ्यंगस्नान करत असताना बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीत विल्सनची आई त्याच्या सुखरुपतेसाठी प्रार्थना करत होती. परंतु, २५ फूट खोल बोअरवेलमधून सुजीतचा मृतदेहच बाहेर काढण्यात आला. याआधी हरयाणातील प्रिन्स नावाच्या मुलाला बोअरवेलच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना होताना अजूनही दिसत नाही.
तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील नादुकट्टुपट्टी येथे शुक्रवारी २५ फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीत विल्सन या दोनवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. सरकारी अधिकाऱ्यांनी सुजीथला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर खोदकाम थांबवण्यात आले. मुलाचा बाहेर काढण्यासाठी अर्धा दिवसाचा कालावधी लागेल, असे बचाव पथकाने सांगितले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बोअरवेल मधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
२५ ऑक्टोबर रोजी खेळत असताना सुजीत खोल बोअरवेलमध्ये पडला होता. सुजीत बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सुजीतपर्यंत पोहोचण्यासाठी बोअरवेलशेजारी जेसीबीच्या सहाय्याने बोगदा खोदण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाच्या टीमने जमिनीच्या दहा फूट खोल खडक असल्याने खोदकाम बंद केले होते.
नादुकट्टुपट्टी येथे राहण्याऱ्या सुजीतला वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य संस्थाांना बोलावले गेले होते. बचावकार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि खाजगी तज्ञ असे डझनभर बचाव पथके घटनास्थळी उपस्थित होते. २७ ऑक्टोबरपर्यंत सुजीथ बेशुद्धावस्थेत असला तरी श्वास घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.त्याचे बचावकार्य सलग ४ दिवस सुरू होते. सुजीथला वाचवण्यासाठी ६५ फूटांपर्यंतचा समांतर खड्डा खोदला गेला होता. मात्र, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मूळ बोअरवेलमधून वास येऊ लागला.
बचावकार्य सुरू असल्याच्या चौथ्या दिवशी, मंगळवारी पहाटे सुजीथचं विघटित शरीर मिळाले व त्याला मृत घोषित करण्यात आले. मुलाचा मृतदेह अत्यंत विघटित अवस्थेत होता, असे महसूल प्रशासनाचे आयुक्त जे राधाकृष्णन यांनी सांगितले. ‘रडू नका, थोडा वेळ रडू नका. मी तुला बाहेर काढीन, अम्मा तुला बाहेर घेऊन जाईल. मी येथे वरतीच उभी आहे’, असे सुजीथची आई काला मेरी सारखी म्हणत होती. यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावत होते.
भविष्यात असे आणखी अपघात होऊ नयेत यासाठी तामिळनाडूतील या बोअरवेलला सिमेंट टाकून बंद करण्यात आले. मात्र, याआधी गुडगाव येथील माही, मुरैना येथील राघवेंद्र, सोनू, अंजू, प्रिन्स ही मुले बोअरवेलसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडलेली आहे. न्यायालयानेही बोअरवेलसाठी खणलेल्या खड्ड्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याचेही पालन कुठेही होताना दिसत नसल्याने अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. भविष्यात अशा घटना होऊ नये, यासाठी सरकार, लोकप्रतिनिधी व नागरिकांनीही ही बाब गंभीरपणे घ्यावी लागणार आहे.