सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे आंदोलन तीव्र; गावांच्या सीमांवर उभारला ‘प्रवेश बंदी’चा फलक
प्रतिनिधी । गोवन वार्ता
वाळपई : जमीन मालकांना त्यांच्या जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी सत्तरी भूमिपुत्र संघटनेने सुरू केलेला लढा शनिवारी तीव्र करण्यात आला आहे. सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ व कुमठोळ भागांतील ग्रामस्थांनी गावांच्या सीमांवरच अभयारण्य व्यवस्थापन आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करणारा फलक उभारून आंदोलनाची धार वाढवली
आहे.
गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत सत्तरी तालुक्यातील जमीन मालकीचा प्रश्न अजूनही अधांतरीच राहिलेला आहे. याशिवाय वनक्षेत्रात राहणाऱ्यांवर अभयारण्य विभागाकडून अधिसूचना जारी करून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. याविरोधात सत्तरी भूमिपुत्र संघटनेना दीर्घ काळापासून लढा देत आहे. या आंदोलनाची धग आता हळूहळू वाढवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर करंझोळ व कुमठोळ गावांच्या सीमांवर अभयारण्य व्यवस्थापन आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी ‘नो एन्ट्री फॉर फॉरेस्ट’ असा फलक उभारण्यात आला. शनिवारी सकाळी धार्मिक पद्धतीने फलक उभारण्यात आला. तत्पूर्वी येथील देवस्थानचे बातू गावडे यांनी फलकासाठी सपत्नीक भूमिपूजन केले. फलक उभारल्यानंतर वासू गावडे आणि कृष्णा गावडे यांनी सार्वजनिक स्वरूपाचे गाऱ्हाणे घातले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा फलक काढून टाकण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस, रणजीत राणे, विश्वेश परब व आंतानियो पिंटू यांनी याप्रसंगी प्रशासकीय यंत्रणांवर टीका केली.