वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी १५५५ जणांवर करवाई
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी :
राज्यात वाहतूक अपघातात वाढ होत असून त्यात मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे वाहतूक पोलिस विभागाने राज्यात १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान वाहतूक नियम उल्लंघन करण्याऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत मद्यपी चालकांसह अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर तसेच इतरांवर मिळून १,५५५ जणांवर कारवाई केली आहे.
वाहतूक पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग १७ च्या पत्रादेवी - कुठ्ठाळी तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ ए च्या फोंडा परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मृत्यू होत असल्याने या परिसरात कडक कारवाई करण्यात आली आहे. फोंडासह राज्यातील इतर परिसरात मिळून वाहतूक पोलिस विभागाने ५३० वाहन चालकांवर आपली चुकीच्या बाजूने वाहन चालविल्या प्रकरणी कारवाई केली आहे. मद्यप्राशन किंवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविल्या प्रकरणी २०० जणांवर, धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे १६० वाहन चालकांवर, अतिवेगाने वाहन चालविल्या प्रकरणी १७५, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यामुळे २९०, तर विनापरवाना वाहन चालविल्या प्रकरणी २०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.