चांद्रमोहिमेतून नवीन मंत्रपुष्पांजलीची निर्मिती

भारताच्या विजीगीषु भविष्यातील चांद्रयुगाची एक नवीच चांद्रमंत्रपुष्पांजली भारताच्या भावी पिढीला लिहावी लागेल, कारण एक ना एक दिवस त्यांना कळून चुकेल की चंद्रावर कुणाचीही मालकी नसली तरी पहिला हक्क आहे तो मंत्रपुष्पांजली रचणाऱ्या द्रष्ट्या भारतीय महासंस्कृतीचा.

Story: नंदनवन | डॉ. नंदकुमार कामत |
25th July 2019, 05:09 am

भारताची दुसरी चंद्रसंशोधन मोहीम १५ जुलैपासून सुरु झाली होती, पण इंजिनातील एका दोषामुळे ती २२ जुलैपर्यंत पुढे ढकलली गेली. अखेर २२ जुलैला दुपारी चांद्रयान-२चे सफल प्रक्षेपण झाले. शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. काही वात्रट प्रतिक्रियाही उमटल्या. कशाला हवे हे सहस्त्र कोटी रूपये खर्चाचे महागडे संशोधन म्हणून काहींनी गळा काढला. पण कुणीही भारतीय संस्कृतीच्या ज्ञान विज्ञान निष्ठेचा विचार केला नाही. ऋग्वेदाची निर्मिती करणारे हे राष्ट्र. अहं ब्रह्मास्मि, तत्वमसि हा विज्ञानाला चकीत करणारा विचार देणारे हे राष्ट्र. ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तातील सांकेतिकतेतून ब्रह्मांड विज्ञानाची गुढ व्याप्ती सूचविणारे हे राष्ट्र. प्रज्ञेची प्रचंड झेप घेणाऱ्या या राष्ट्राने अंतराळाला गवसणी घालणे हे साहाजिकच. कारण ऋग्वेदापासून दासबोधकार समर्थ रामदासांपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडाला कवेत घेण्याची ईर्षा या मातीतून वेळोवेळी प्रकटली आहे. ‘अणूरेणीया थोकडा, तुका आकाशाएवढा’ हा विचार त्याकाळी या ईर्षेतूनच जन्मला आणि प्रखर आशावादी, विजीगिषु अशा असामान्य भारतीय प्रज्ञेतूनच मंत्रपुष्पांजलीची निर्मिती झाली. या कडव्यातील भावना भारताच्या नवोन्मेसी चांद्रसंशोधन मोहीमेला अनुरुप आहेत. इस्त्रोच्या अंतराळशास्त्रज्ञांनी ती वाचली, उच्चारली नसतील पण त्यांनी तटस्थपणे कुठचाही वृथा अभिमान न बाळगता ही कडवी अभ्यासली तर त्यांना ‘चांद्रमंत्रपुष्पांजली’ रचण्याची स्फूर्ती मिळेल.
भारत ही निव्वळ संस्कृती नसून एक महासंस्कृती आहे. सुपरसिव्हीलायझेशन. आपल्याच अज्ञानामुळे, पोरकटपणामुळे या महासंस्कृतीला धर्म, जात, पंथांच्या छोट्या छोट्या कुप्यांत कोंबून आपण तिचे अवमूल्यन करून टाकले आहे. आता चांद्र संशोधन मोहीमेचा व मंत्रपुष्पांजलीतील ‘व्हिजन’चा संबंध काय? त्यासाठी सर्वप्रथम मंत्रपुष्पांजलीतील श्र्लोकांचा अर्थ जाणून घेऊ.पहिला श्र्लोक आहे यज्ञेन यज्ञं अयजन्त देवा: तानि धर्माणि प्रथमानि आसन तेह नांक महिमान: सचन्तयत्र पूर्वे साध्या: संति देवा.याचा अर्थ देवांनी यज्ञरुप प्रजापतीची पूजा केली. यज्ञाधारीत उपासनेचे ते प्रारंभीचे धार्मिक विधी होते. ज्या​ ठिकाणी पूर्वी स्वर्गलोकी देवता निवास करीत असत ते स्थान त्यांनी यज्ञकर्म करून ते महान गौरव प्राप्त करु शकले. आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा जीएसएलव्ही मार्क ३ द्वारे एक महाअग्नीज्वाला प्रज्वलीत केलेली आम्ही पाहिली. त्यांनी ज्ञानयज्ञकर्म केले. चांद्रयान प्रक्षेपणाचे याज्ञीय कर्म विधीवत पूर्ण केले व खरोखरीच देवांच्या निवासाकडे, चंद्रलोकाकडे झेपावण्याची ईर्षा बाळगली. म्हणजेच मंत्रपुष्पांजलीतील भावना विज्ञानरुपी यज्ञकर्माला अनुरुप आहेत. दुसरा श्र्लोक आहे, ओम राजाधिराजाय प्रसह्य साहि ने। मनोवयं वैश्रवणाय कर्म हे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु, कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:, याचा अर्थ आहे- आमच्यासाठी सर्वकाही अनुकूल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वर कुबेर कामना करणाऱ्या मला अपेक्षित पूर्ति देवो, माझ्या कामनांची पूर्ती करो. चांद्र मोहिमेचे अंतिम ध्येय भारताला श्रीमंती, वैभव मिळवून देण्याचे आहे. त्यामुळे या श्र्लोकातील अर्थही चांद्रमोहिमेस अनुरुप आहे. तिसरा श्र्लोक तर चक्क आपल्याला दाखवून देतो की हजारो वर्षांपूर्वी समषटीचा विचार फार खोल व व्यापक होता व आता चांद्रसंशोधक या तिसऱ्या श्र्लोकातील सीमा व व्याप्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची नाळ तोडून चंद्र वसाहतीकडे, येऊ घातलेल्या भारतीय मानवी वसाहतीपर्यंत नेणारी आहे. तिसरा श्र्लोक आहे- उोम स्वस्ति। साम्राज्य, भौज्ये, स्वाराज्यं, वैराज्य, पारमेषट्यं, राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं, म्हणजे’ आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकांचे राज्य असावे. आमचे राज्य आसक्ति व लोक विरहित असावे. अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी. चांद्रतळाचा नेमका हाच उद्देश आहे. भारतीयांची नुतन वसाहत. त्यानंतरचा श्र्लोक आहे. समन्त पर्यायीस्थात सार्वभौम सार्वासुष: आन्तादा परार्धात्। पृथीव्यै समुद्र पर्यंताया एकराळ इति। चांद्रसंशोधकांनाही हेच सांगायचे आहे. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असावे. सागरापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंध व दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे प्रार्ध वर्षे सुरक्षित राहो. केवढा अगडबंब हा विचार? शेवटचा श्र्लोक ही चंद्रावर येत्या काळात रचू घातलेल्या चांद्रमंत्र पुष्पांजलीची नांदीच आहे. हा श्र्लोक आहे. - तद्प्येष: श्र्लोकोभिगीता। मरुत. परिवेषटारो मरुतस्थावसन गृहे। आविक्षितस्थ कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति। म्हणजे या कारणास्तव अशा राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्र्लोक आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या रा ज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच प्रार्थना: ही प्रार्थना आपल्या महान, द्रष्ट्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी रचताना भारताच्या आजच्या चांद्रमोहीमेचा विचारही केला नव्हता म्हणून त्यांचे क्षितिज पृथ्वीपर्यंत मर्यादित राहिले.
ही मंत्रपुष्पांजली चंद्रावर चालणार नाही कारण तिथे पृथ्वीचा संदर्भ देता येणार नाही.त्यासाठी एक नव्या युगाची, भारताच्या विजीगीषु भविष्यातील चांद्रयुगाची एक नवीच चांद्रमंत्रपुष्पांजली भारताच्या भावी पिढीला लिहावी लागेल, कारण एक ना एक दिवस त्यांना कळून चुकेल की चंद्रावर कुणाचीही मालकी नसली तरी पहिला हक्क आहे तो मंत्रपुष्पांजली रचणाऱ्या द्रष्ट्या भारतीय महासंस्कृतीचा.