म्हापशासाठी भाजपचा विकासाभिमुख जाहीरनामा

बोडगेश्वर प्लाझा येथे नगर नियोजन योजना लागू करण्याचे आश्वासन


15th April 2019, 02:03 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : भाजपने रविवारी म्हापसा मतदारसंघासाठी विकासाभिमुख जाहीरनामा प्रकाशित केला, मात्र त्यात विकास प्रकल्पांची कधी सुरुवात करणार व कधी काम पूर्ण करणार याचा उल्लेख नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चार वर्षांपूर्वी नगर नियोजन योजनांखाली म्हापसा शहरातील काही भागांचा विकास करण्याची कल्पना मांडली होती. सध्या काही नागरिकांनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.
या जाहीरनाम्यावर नजर टाकल्यास त्यात विशेष असे काही नाही. मागील निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचा त्यात पुन्हा समावेश करण्यात आला आहे. बोडगेश्वर प्लाझा येथे नगर नियोजन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी माजी आमदार किरण कांदोळकर, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, सत्ताधारी गटातील नगरसेवक व उमेदवार जोशुआ डिसोझा यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.
जोशुआ डिसोझा यांच्या या जाहीरनाम्यात रवींद्र भवन, कला म्युझियम व पार्किंगची सोय असलेले बहुउद्देशीय समाजगृह उभारण्याचे आश्वासन दिले आहे. रवींद्र भवन बांधण्याचे आश्वासन भाजपच्या गेल्या दोन कार्यकाळात देण्यात आले होते, पण प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही. नगर नियोजन योजनांचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या योजनेखालील प्रकल्प कधी पूर्ण होतील, हे कोणीच सांगू शकत नाहीत.
भाजपने स्टेट ऑफ आर्ट बहुस्तरीय बसस्टॅण्ड लवकरात लवकर बांधून तो सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. या बसस्टॅण्डसाठी २०१५ मध्ये १.३२ कोटी रुपये खर्च करून २० हजार चौरस मीटर जमिनीत भराव टाकण्याचे काम तेवढे आतापर्यंत करण्यात आले आहे, त्यापुढे काहीही झालेले नाही. वाहतूक खाते हा बसस्टॅण्ड बांधत असून त्यांनी आवश्यक ते सर्व परवाने मिळविले आहेत व पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल, असे उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी ‘गोवन वार्ता’ला सांगितले.
तार नदीवर नवीन पूल, म्हापसा मार्केटसाठी मास्टर प्लॅन व शहरातील गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन हे जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे आहेत, मात्र म्हापसा पालिका मंडळाने ते हाती घेऊन त्या संबंधीचे ठरावही बऱ्याच पूर्वी संमत केलेले आहेत. भंगार अड्डे शहराबाहेर नेणे, भूमिगत केबलिंग, पाणी पुरवठा नेटवर्क सुधारणे, प्रमुख सरकारी कार्यालयांचे स्थलांतरण याचाही जाहीरनाम्यात समावेश आहे.