‘आदर्श ग्रामा’त सुविधांचा अभाव

इब्रामपूरच्या ग्रामस्थांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर कैफियत


16th March 2019, 05:45 pm

वार्ताहर । गोवन वार्ता

धारगळ : केंद्र सरकारच्या आदर्श ग्राम योजनेंतर्गत पेडणे तालुक्यातील इब्रामपूर-हणखणे ग्रामपंचायत उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दत्तक घेऊन वर्षे लोटली, परंतु इथल्या लोकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचे शुक्रवारी समोर आले. काँग्रेस पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान ही बाब उघड झाली.      

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर-हणखणे ग्रामपंचायत दत्तक घेतल्यापासून येथील ग्रामस्थांच्या जीवनमानात काय बदल झाला, हे जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे शुक्रवारी गावात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांनी त्यांना प्राथमिक गरजांपासून वंचित रहावे लागत असल्याची व्यथा मांडली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, पेडण्याचे काँग्रेस गटाध्यक्ष उमेश तळावणेकर, सुभाष केरकर, बाबी बागकर, विठू मोरजकर, मेघश्याम राऊत, विवेक नाईक, सचिन परब, ट्रोजन डिमेलो आदी पदाधिकारी उपस्थित होते.                           

उत्तर गोवा खासदार या नात्याने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर गाव आदर्श बनवण्यासाठी दत्तक घेतले होते. मात्र, हा उपक्रम केवळ दिखावा होता, अशी टीका यावेळी ग्रामस्थांनी बैठकीत केली. गावात जो थोडाफार विकास झाला, त्यावर खासदार आणि स्थानिक आमदार हे दोघेही श्रेय लाटत आहे. मंत्री नाईक यांनी गावाच्या विकासासाठी केंद्रातून खास निधी उपलब्ध केला नाही. वीज, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांसाठी आजही ग्रामस्थांना झगडावे लागते. याला ‘आदर्श ग्राम’ म्हणावे का? असा थेट सवालच काही गावकऱ्यांनी उपस्थित केला. 

‘आदर्श गाव’ बनवण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपणहून जबाबदारी घेतली होती. इब्रामपूरच्या ग्रामस्थांना विकासाचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले आहे.

— विवेक नाईक, ग्रामस्थ  

निव्वळ विकासाची आश्वासने देऊन जनतेला फसवणाऱ्यांना दूर करण्यासाठीच निवडणुका असतात. जनतेने अशा नेत्यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे.

— उमेश तळावणेकर, काँग्रेस गटाध्यक्ष, पेडणे

‘आदर्श ग्राम’ केवळ कागदावरच : चोडणकर

मोठा गाजावाजा करून मागच्या पाच वर्षांपूर्वी खासदार श्रीपाद नाईक यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत  इब्रामपूर गाव दत्तक घेतले होते. पण त्या ठिकाणी कोणत्याच योजना पुरवलेल्या नाहीत. केवळ ‘संसद आदर्श ग्राम’ योजना हा कागदोपत्री भक्कम वाटत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.