मुलांचे अपघात व प्रथमोपचार

मुुलांची शाळा चुकेल, अभ्यासक्रम शिकायचा राहून जाईल, त्यांचा त्यांच्या परीक्षेवर परिणाम होईल या भीतीने पालकांनी मुलांना त्यांच्या खोडकरपणाबद्दल न दटावता, रागे न भरतां त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत.

Story: ज्ञानसरिता | प्रा. सुरेंद्र वसंत सिरसा |
05th March 2019, 05:35 am

लहान मुले अजाण असतात. काही मुले भित्री असतात, वात्रट असतात, काही खोडकर असतात तर काही मुले अतिशहाणी असतात. नको त्या वस्तूंना हात लावणे, एखादी छोटी वस्तू हाती लागली तर नाका-तोंडा-कानांत कोंबणे, धारदार वस्तू हाती मिळाली तर हाती मिळेल ते कापत सुटणे, असे उद्योग सतत करीत असतात. घरातील हान मुलांचे आजारपण, त्यांना होणारे गंभीर वा किरकोळ स्वरुपाचे अपधात पालकांना टाहणे काही शक्य नसते. दर वेळेला पालकांना वैद्यकीय उपचारांसाठी मुलांना डाॅक्टरकडे तवरीत नेणे शक्यच होते असे नाही. त्यामुळेच मुलांवर त्यापूर्वीच काही प्रथमोपचार करावे लागतात. पालकांना प्रथमोपचाराची व काही किरकोळ औषधांची माहिती असल्यास गरजेवेळी काही प्राथमिक उपचार करणे शक्य असते. याशिवाय घराजवळील डाॅक्टरचे नंबर, त्यांच्या क्लिनिकचा दूरध्वनी क्रमांक, जवळ इस्पितळ असल्यास इस्पितळाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, त्वरीत औषधोपचाराची सेवा देणाऱ्या शासकीय किंवा खाजगी इस्पितळातील रुग्णवाहिका यांचे क्रमाक जवळ असल्यास मुलांना डाॅक्टरकडे नेणे किंवा इस्पितळात दाखल करणेही शक्य होऊन जखमी किंवा आजारी मुलांवर त्वरीत उपचार करता येतात. त्यामुळे मुलांच्या जिवावरील धोका टळतो. घरात दूरध्वनी नसेल तर जवळपास कुठे सार्वजनिक दूरध्वनी असेल तर त्याची माहितीही पालकांना असणे गरजेचे आहे. आवश्यकता भासली तर शेजारी किंवा अनोळखी माणसाची देखील मदत देण्याची तयारी ठेवली पाहिजे अशा कठीण प्रसंगी कुणीही मदत व सहकार्य करण्यास तत्पर असतो त्यामुळे त्यांच्याकडून मदत मागण्यास संकोच करु नये. घरात फक्त मुलांची आईच असेल तर वडील कामावर गेले असतील तर त्या मुलांच्या मातेनं या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. 

बालपणात काही मुलांना ताप, फेफरे, फीटस् येण्याची सवय असते त्यामुळे ती अनेकदा बेशुद्ध पडतात. त्याचप्रमाणे दीर्घकालीन आजारपण, गुदमरणे, मानसिक धक्का बसणे, उपासमार-भूक, निरनिराळ्या प्रकारचे अपघात त्यामुळेही मुले बेशुद्ध होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वरीत उपाय म्हणून कांदा चेचून हुंगण्यास दिल्यास किंवा तुरडाळ सहाणेवर गंधाबरोबर उगाळून त्या गंधाचे डोळ्यात टाकल्यास त्याचाही उपयोग होऊ शकतो. घरगुती उपाय करुनही मूल शुद्धीवर येत नसेल तर त्यास जवळच्या डाॅक्टरकडे किंवा ​इस्पितळात नेणे गरजेचे आहे. काही वेळा मुलांना बालपणापासून हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब यासारख्या व्याधींही असतात, त्यामुळे बालपणापासून जडलेल्या व्याधींना डाॅक्टरांनी यापूर्वी दिलेल्या औषधांची यादी ठेवली तर ती औषधे देण्याचाही फायदा होऊ शकतो. काही मुलांना माती शेणाने सारवलेल्या जमिनीचे उखडलेले खपले, भिंतीला दिलेल्या रंगांना आलेल्या पोपड्याचे तुकडे तोंडात घालण्याची सवय होते. मुले अनेकदा हातात मिळेल ते तोंडात टाकतात. त्यात काही विषबाधक वस्तूही असतात. पालकांना विषबाधेची खरीच लक्षण ठाऊक असतात असे नव्हे, तरी सुद्धा मळमळणे, पोटांत कळ येणे, शुद्ध हरपणे यासारखी लक्षणे विषबाधेची सूचना देतात. विषबाधेमुळे मूल जरी बेशुद्ध पडलेलं असते तर मिठाच्या गुळणीशिवाय त्याच्या तोंडात काहीही टाकू नये. नंतरच्या प्राथमिक उपचारानंतर त्याला त्वरीत इस्पितळात किंवा डाॅक्टरांकडे उपचारार्थ न्यावे. जाताना डाॅक्टरांना दाखवण्यासाठी ज्यामुळे विषबाधा झालेली आहे, हे डाॅक्टरांना कळून येईल व त्यांना योग्य ते औषधोपचार करता येतील.
लहान मुलं खोडकर असल्यामुळे खुर्ची, टेबल, खिडकी, झाडे यावर चढण्याचा प्रयत्न करतात व तोल जाऊन खाली पडतात. अशावेळी डोक्याला मार बसलेला असल्यास किंवा जखम झालेली असल्यास त्या जखमेची तीव्रता पाहून त्यानुसार घरीच प्रथमोपचार व नंतर इस्पितळात किंवा डाॅक्टरांकडे नेऊन संपूर्ण तपासणी करणे गरजेचे असते.
काही मुले स्वयंपाक घरात आईच्या मागे-मागे असतात. कधी कधी गरम झालेल्या तव्याला, पेल्याला, पातेलेला हात लावतात. कधी गरम पाण्यात हात घालतात. चुकीनं कधी गॅस किंवा चुलीतील आगीत हात भाजून जातो. कधी गरम पाणी अंगावर पडल्याने कातडी जळते. अशावेळी बर्नोलसारखी क्रीम घरात असेल तर ती त्वरीत जखमेवर लावावी. जखम पाण्याने धुउन नये किंवा त्यावर गरम कपडा बांधू नये. जखमेवर जंतू किंवा माशा बसू नयेत म्हणून डाॅक्टरकडे किंवा इस्पितळात जाईपर्यंत स्वच्छ कपडा हाताच्या किंवा पायाच्या जखमेवर गुंडाळावा. प्रथमोपचारानंतर जखमी मुलास त्वरीत डाॅक्टरकडे किंवा इस्पितळात नेऊन उपचार करुन घ्यावेत. त्याचप्रमाणे स्वयंपाक घरात किंवा जेवण्याच्या टेबलावर सुरी, विळी यासारख्या धारधार वस्तूही ठेवणे धोक्याचे असते. धारधार वस्तू योग्य रितीने हाताळल्या नाही तर तर हाता-पायांना जखम होण्याचा संभव असतो. जखम किरकोळ असेल तर ती वाहत्या पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने किंवा कापसाने धुवून घ्यावी व त्यावर डेटोलसारख्या जंतू नाशकाने ती पुसून घेऊन त्यावर आयोडीन किंवा मलम लावावे. जखमेचं स्वरुप गंभीर असेल तर रक्तप्रवाह थांबत नसेल, वस्तू गंजलेली असले तर त्वरीत डाॅक्टरकडे किंवा इस्पितळात नेऊन योग्य ते उपचार करावेत.
लहान मुले थोडीशी खोडकर, वात्रट असतात. काही वेळा मुले जेवताना किंवा खाताना मोठा घास घेतात. भावंडाबरोबर बोलताना हसतात. थोडसं तिखट लागल्यास रडतात, त्यामुळे अन्न श्वासनलिकेत अडकून मूल गुदमरण्याची शक्यता असते. अशावेळी मुलांच्या पाठीवरुन वरुन खालपर्यंत हात फिरवल्यास किंवा पाठीवर बुक्के मारल्यास अन्न श्वासनलिकेतून पोटात उतरु शकते. काही वेळा मुले पेपरमिंटची गोळी, सागरगोटा, गोटी, सोगटी यासारख्या वस्तू तोंडात घालतात. अनेकदा चुकून या वस्तू मुलांनी गिळण्याचा प्रयत्न केल्यास त्या घशांत अडकून गुदरमरण्याची शक्यता असते. अशावेळी पालकांनी घरगुती उपाय करीत न बसता त्वरीत कान, नाक व घशाच्या तज्ञ डाॅक्टरांकडे घेउन जाणे योग्य आहे.
कुत्रा, मांजर, साप, माकड, मधमाशी, पक्षी, मुंगी, मुंगळा, डांस, उंदीर यासारख्या सजीव प्राण्यांनी व किटकांनी चावा घेतल्यास प्रथमोपचानंतर जखमेची तीव्रता लक्षात घेउन मुलांना त्वरीत इस्पितळात किंवा डाॅक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे असते. काही प्राणी अतिशय विषारी असल्यामुळे त्यावर योग्य ते इंजेक्शन देऊन उपाययोजना केली पाहिजे. काही वेळा एकापेक्षा जास्त इंजेक्शनेही डाॅक्टरी सल्ल्यानुसार घ्यावी लागतात.
मुलांच्या पायांत काटे, कुसळ, लाकडाचे फोलपट यासारख्या अणकुचीदार वस्तू अनेकदा डोळ्यांना दिसत नाहीत, पुढे त्याचे जखमेत रुपांतर झाले तर हातापायात अडकून पडलेली वस्तू जागा सुजून लाल होते व ठणका लागतो. सुईसारखी टोकदार वस्तू दिव्याच्या किंवा गॅसच्या ज्योतीवर गरम करुन व जखमेवर जंतूनाशक लावून हळूवारपणे हातात किंवा पायात घुसलेली वस्तू बाहेर काढावी. हात-पायात घुसलेली वस्तू खूप दिवस न काढता आत राहिल्यास किंवा पूर्णपणे बाहेर न काढल्यास त्याचे ‘कुरुप’ होण्याचा संभव असतो.
मुले जस-जशी वयानं वाढत जातात, तशी तीन चाकी दुचाकी यासारखी वाहने चालवतात. वाहन चालवताना तोल गेल्यास वाहनांची टक्कर झाल्यास वाहनावरुन खाली पडून जखम होण्याचा किंवा हाता-पायाचं हाड मोडण्याचा संभव असतो. अपघात घरातच झालेला असेल तर प्रथमोपचार करुन डाॅक्टराकडे नेणे बरे असते. अपघात घराबाहेर किंवा रस्त्यावर झालेला असेल तर इतरांच्या सहाय्याने त्वरीत इस्पितळात नेऊन उपचार करुन घ्यावेत त्यामुळे जीवावरचा धाेका टाळणे शक्य होईल.
प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेली औषधे, मलम, कापूस, कात्री आदी वस्तू घरात असल्यास त्वरीत, प्रथमोपचार करण्यास सहाय्यभूत ठरतात हे पालकांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे.
मुुलांची शाळा चुकेल, अभ्यासक्रम शिकायचा राहून जाईल, त्यांचा त्यांच्या परीक्षेवर परिणाम होईल या भीतीने पालकांनी मुलांना त्यांच्या खोडकरपणाबद्दल न दटावता, रागे न भरतां त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. तशी मुलं समंजस असतात. त्यांना योग्य मार्गाने नेले तर त्यांचा खोडकरपणा कमी होणे शक्य असते. हे ही पालकांनी ध्यानात घेऊन योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.      

0000


थोडी मुलं, खिळा, सुई यासारख्या वस्तू तोंडात घालतात, त्यामुळे त्यांच्या मुखाला, घशाला इजा होते. अशावेळी रेचक देऊन, हळदीची पुड लावून त्वरीत डाॅक्टरकडे नेऊन क्ष ​किरणाने तपासणी केल्यास मुखातील किंवा पोटातील जखमेची तीव्रता कळून त्याप्रमाणे उपचार करता येतात. पोहण्यास गेलेली, पोहणे शिकण्यास गेलेली, समुद्र किनारा, तलाव, नदी या ठिकाणी फिरण्यास किंवा सहलीस गेलेली असता मुले पालकांचा डोळा चुकवून पाण्याकडे गेली असता चुकून त्यात बुडण्याचा प्रसंग उद्भवला तर प्रथमोपचार म्हणून पोटांत गेलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मुलांना पोटावर झोपवून पाठीवर दाब दिल्यास किंवा बुक्के मारल्यास पोटातून पाणी बाहेर पडून त्याला श्वासोच्छ्वास घेणे शक्य होईल. शिवाय तोंडात तोंड घालून जोरानं श्वसन केल्यास पोटातून पाणी बाहेर येऊ शकते.