सत्तरीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती

शिवाजी देसाई : गोमंतक मराठी भाषा परिषदेची साहित्यिक सहल


22nd January 2019, 05:35 pm



पणजी : खरे साहित्य मातीतून जन्माला येते आणि मातीतून जन्माला आलेल्या साहित्याला समाज मान्यता मिळते. म्हाळू गावस हे सत्तरी तालुक्यात ‘गुडविल’ असलेले व्यक्तिमत्व. जे सत्तरीच्या मातीतून विकसित झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘माझा विमान प्रवास’ या पुस्तकाला सत्तरीच्या मातीचा सुगंध आहे. सत्तरी तालुक्याच्या मातीत दर्जेदार साहित्य निर्मितीचे बीज आहे, असे प्रतिपादन अॅड. शिवाजी देसाई यांनी केले.

मासोर्डे सत्तरी येथे गोमंतक मराठी भाषा परिषदेच्यावतीने आयोजित साहित्यिक सहलीच्या वेळी म्हाळू गावस यांच्या ‘माझा विमान प्रवास’ या पुस्तकावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मासोर्डेतील शांतादुर्गा रवळनाथ महादेव देवस्थानाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर डॉ. आरती दिनकर, म्हाळू गावस, डॉ. जेनेट बोर्जीस, सुदेश आर्लेकर, मंदा स्तुगिरे, शीतल साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. अनुराधा म्हाळशेकर व दामोदर मळीक यांनी त्यांनी लिहिलेल्या कथांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. भालचंद्र मयेकर यांनी केले. अनुराधा म्हाळशेकर यांनी आभार मानले.

सहलीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुदेश आर्लेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गावस, अॅड. रोहिदास गावकर, प्रकाश ढवण, सविता गिरोडकर, प्रदीप गवंडळकर यांची उपस्थिती होती. सुदेश आर्लेकर यांनी साहित्यक सहल कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. यातून नवीन साहित्यिक निर्माण होण्यासाठी पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मासोर्ड्याची झर, बंधारा, नद्यांचा त्रिवेणी संगम अशा विविध निसर्ग ठिकाणानंतर सहलीचा समारोप मासोर्डेतील शांतादुर्गा रवळनाथ महादेव सभागृहात झाला.

कवी संमेलन रंगले

मासोर्डे नदीच्या त्रिवेणी संगमावर कवी संमेलन झाले. डॉ. आरती दिनकर, डॉ. जेनेट बोर्जीस, शितल साळगांवकर, अनुराधा म्हाळशेकर, संदीप केळकर, सविता गिरोडकर, प्रकाश ढवण, अॅड. भालचंद्र मयेकर, दामोदर मळीक, मंदा सुगीरे, वनिता वरक आदींनी दर्जेदार कविता सादर केल्या.