खाणप्रश्नी आज भाजपाध्यक्ष अमित शहांशी चर्चा

मायनिंग पीपल्स फ्रंट, खासदार, मंत्री दिल्लीत


13th January 2019, 02:22 am



विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील खाण प्रश्नावर तोडगा काढण्याचा एक प्रयत्न म्हणून खाण अवलंबितांची बाजू मांडण्यासाठी भाजपचे गोव्यातील तीन खासदार, काही मंत्री व आमदार, तसेच गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर व अन्य काहीजण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रविवारी भेटणार आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहा यांच्या भेटीची वेळ ठरलेली नव्हती.
केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी शहा यांची रविवारी भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी भाजपचे गोव्यातील मंत्री, आमदार व तिन्ही खासदार दिल्लीत आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे शनिवारी गोव्यात होते, परंतु तेही सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. रविवारी दुपारी शहा यांची भेट घेण्याचे निश्चित आहे, परंतु अजूनही वेळ ठरलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील खाणींचा प्रश्न वेगळा आहे. १९८७ पासून गोव्यातील खाणींच्या लीजचा कार्यकाळ ग्राह्य धरून गोव्याला खाण, खनिज विकास व नियमन कायद्यातून सूट द्यावी, त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी गोव्याची आहे. रविवारी गोव्यातील खाण अवलंबित, मंत्री, आमदार व खासदार ही मागणी शहा यांच्याकडे करतील.
आम्ही दिल्लीत पोहोचलो असून, रविवारी शहा यांना भेटणार आहोत, पण अजून वेळ निश्चित झालेली नाही, असे गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी सांगितले.
७ फेब्रुवारी २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाणींचे दुसरे नूतनीकरण वैध ठरवल्यामुळे १६ मार्चपासून खाणी बंद आहेत. राज्य सरकारने या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकाही दाखल केली नाही. चार दिवसांपूर्वी संसदेचे अधिवेशन संपले, पण एमएमडीआर कायद्यात दुरुस्तीही झाली नाही. केंद्राकडून गोव्याला अजूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. रविवारी शहा यांच्या भेटीनंतर खाणप्रश्नी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मनात नेमके काय आहे त्याचा अंदाज येईल.
-०-
खाण कामगारांची अस्वस्थता वाढली
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : खाण कामगारांनी शनिवारी नार्वे येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विजय सरदेसाई, प्रवीण झांट्ये यांना खाणी कधी सुरू होणार, याबाबत प्रश्न केले. अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का होत नाही, आम्ही किती वेळ वाट पाहायची आदी प्रश्न उपस्थित करून मंत्र्यांना धारेवर धरले.
सेसा कामगार, चौगुले खाण कामगार व इतरांनी यावेळी विविध प्रश्न उपस्थित करून आपली भूमिका मांडली. यावेळी सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत कसून लवकरच ही भेट होणार आहे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
विजय सरदेसाई यांनी सांगितले की, खाण प्रश्नावर तोडगा आपण सर्वप्रथम सुरेश प्रभूंना भेटलो होतो. राज्यात व केंद्रात भाजप आहे. त्यांनी याबाबत तातडीने हा विषय मार्गी लावणे गरजेचे आहे. खाण मालकाच्या भूमिकेवर सरकारचे लक्ष असून, खाण कामगारांना पगार कपात व कामगारांना कमी केलेल्या कंपनीवर आमचे लक्ष आहे. चौगुले खाण लीजवर असून कुणाची मालमत्ता नाही, त्यामुळे कामगारांनी गोंधळून न जाता थोडा धीर धरावा. लवकरच केंद्रची भूमिका कोणती आहे ते कळेल. त्यानंतर आपण आपली भूमिका मांडू, असे सरदेसाई यांनी कामगारांना सांगितले. यावेळी कामगारांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी आग्रही मागणी केली.
नार्वे सप्तकोटेश्वर मंदिराच्या नूतनीकरण कार्यक्रमास आलेल्या राजकीय नेत्यांना जाब विचारण्यासाठी खाण कामगार मंदिर परिसरात जमले होते. यावेळी पोलिसांनी गेटच्या बाहेर जाण्यास सांगितल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी कामगारांना बाहेर ठेवणे चुकीचे असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. कामगारांनी धीर सोडू नये, सरकारच्या भूमिकेची थोडी वाट पहावी, योग्य निर्णय होतील, अशी खात्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली.