काणकोण : पैंगिण बाजारालगतच्या हाददुरीग पुलाला तडे गेल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या एका बाजूचा कठडाही कोसळला असल्याचे या प्रभागाचे पंच रामदास पुजारी यांनी नजरेस आणून दिले आहे. या पुलावरून हजारो वाहने ये -जा करतात. शिवाय गालजीबाग, तळपण मार्गावरील बसेस त्याचा वापर करत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा पूल धोकादायक बनला असल्याचे पुजारी यांनी म्हटले आहे. २००९ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी या पुलावरून पाणी गेले होते. पुलाची दुरूस्ती करण्यासंबंधी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खाते टाळाटाळ करत असल्याचे पुजारी यांनी सांगितले.