अनागोंदी कारभाराला राज्यपाल सिन्हाच जबाबदार

काँग्रेसने मागितला राज्यपालांचा राजीनामा; राष्ट्रपतींना लिहिणार पत्र


17th December 2018, 06:31 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : सध्या राज्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा याच जबाबदार आहेत. घटनात्मक अधिकारिणी म्हणून कर्तव्य न बजावता त्या भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष असल्यासारख्याच वागत आहेत. त्यामुळे त्यांनी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा, किंवा राष्ट्रपतींनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात आगामी तीन दिवसांत राष्ट्रपतींशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पणजी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रवक्ते उर्फान मुल्ला तसेच नुकतेच पक्षात प्रवेश केलेले रियाज शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

चोडणकर पुढे म्हणाले, ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी राज्यपाल सिन्हा यांनी लोकशाहीचा खून केला. संख्याबळ कमी असतानाही भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली. वास्तवात त्यांनी सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची एक संधी देण्याची आवश्यकता होती. परंतु त्यांनी तसे केले नाही. आता तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने सरकारमधील आघाडी पक्षाचे मंत्री आणि आमदार प्रशासन ठप्प झाल्याचे उघडपणे बोलत आहेत. शासकीय अधिकारी विकास प्रकल्प तसेच इतर प्रकल्पांची कामे अडवून ठेवत असल्याचा आरोपही करीत आहेत. त्यानंतर काही दिवसांनी तेच मंत्री सरकार चांगले काम करीत असल्याचा दावा करत आहेत. यावरून राज्यात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत राज्यपालांनी स्वेच्छा दखल घेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न करता भाजपच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षपदावर असल्यासारखे वर्तन केले, असा घणाघाती आरोप चोडणकर यांनी यावेळी केला. 

राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीची कल्पना देण्यासाठी काँग्रेसने पाच ते सहावेळा राज्यपालांची भेट घेऊन भेट घेतली. प्रत्येकवेळी त्यांनी केवळ आश्वासने दिली आणि त्या पलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे आता आणखी त्यांच्या भेटी घेण्याचे बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अगदी गोवा मुक्तीदिनी म्हणजेच दि. १९ डिसेंबर रोजी राजभवनावर आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीवरही प्रदेशाध्यक्ष या नात्याने बहिष्कार घालणार असल्याचे चोडणकर यावेळी म्हणाले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत मडगाव येथील गांधी मार्केट रहिवासी संघटनेचे अध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते रियाज शेख यांनी सुमारे ३०० कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.