गयाना :
पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध महिलांच्या आयसीसी विश्व टी-२० टुर्नामेंटमध्ये आपल्या गटात दुसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (१०३) शतकाच्या जाेरावर न्यूझीलंडला नमवले होते.
भारतीय संघाला जगातील पहिल्या टी-२० संघात स्थान नाही मात्र न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ५१ चेंडूत १०३ धावांच्या खेळीमुळे ३४ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून आता पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत २०१६ साली मायभूमीत झालेल्या विश्व टी-२० सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न करणार.
दिल्लीत झालेल्या त्या पराभवानंतर भारत आशिया चषकाच्या दोन टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानसमोर तीन वेळा आला व तिनही वेळा भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानला आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ५२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतासाठी युवा जेमिमा रॉड्रिगीसने शानदार प्रदर्शन केले आहे.
प्रोविडेंस स्टेडियमवरील खेळपट्टी संथगती गोलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे व पहिल्या सामन्यात भारताने ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा व डायलन हेमलता, लेग स्पिनर पूनम यादव व डावखुरी फिरकीपटू राधा यादवच्या रुपात चार संथगती गोलंदाजांचा वापर केला होता. न्यूझीलंडच्या ९ पैकी ८ खेळाडूंना भारताच्या फिरकीपटूंनी माघारी धाडले.
पाकिस्तानविरुद्ध भारत मानसी जोशी किंवा पूजा वस्त्राकार यांच्यापैकी एकाला दुसरी वेगवान गोलंदाज म्हणून संधी देऊ शकतो. पाकिस्तानकडे कर्णधार झावेजरिया खान, अनुभवी फिरकीपडू सना मीर व अष्टपैलू बिसमाह मारूफच्या रुपात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली होती.
ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान पराभूत
शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा एकही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. बिसमाह २६ धावा करून सर्वाधिक धावा बनवणारी पाकिस्तानी फलंदाज ठरली. पहिल्या ८ षटकांत पाकिस्तानची गोलंदाजी दिशाहीन ठरली व याचा फायदा उठवत बेथ मूनी व एलिसा हिलीने ७२ धावा जोडल्या. सनाने चार षटकांत ३२ धावा लुटवल्या परंतु तिला एकही गडी बाद करता आला नाही.
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रोड्रिगीस, स्मृती मानधाना, तानिया भाटिया, एकता बिष्ट, डायलन हेमलता, मानसी जोशी, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील, पूनम यादव, मिथाली राज, अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार व राधा यादव.