नोटाबंदी फसल्याने मोदींनी पायउतार व्हावे

माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांचे टीकास्त्र


09th November 2018, 06:37 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री नोटबंदीचा अत्यंत देशविघातक निर्णय लागू केला. हा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरल्याने पापाचे प्रायश्चित्त म्हणून मोदी यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे. तसे न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी केले. 

पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. नोटबंदीचा आदेश जारी करताना मोदी यांनी १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. देशात देशात अब्जावधी रुपयांचा काळा पैसा अाहे. त्याआधारे देशात समांतर अर्थव्यवस्था सुरू असल्याने हा निर्णय आवश्यक होता, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते. पण दोन वर्षे उलटले तरी परिस्थिती तीच आहे, असे खलप यावेळी म्हणाले.

नोटबंदी काळात सरकारने आर्थिक व्यवहाराचे डिजिटलायझेशन करण्यास नागरिकांना भाग पाडले. विदेशी कंपन्यांना फायदा झाला. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरल्याने जनतेने पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा, असे आवहन खलप यांनी केले.

खलपांचे पार्सेकर यांना आव्हान

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना खरोखरच स्वाभिमान असेल तर त्यांनी मांद्रे मतदारसंघात आगामी पोटनिवडणुकीत दयानंद सोपटे यांचा पराभव करण्यासाठी वावरावे, असे आव्हान खलप यांनी केले आहे. पार्सेकर आपल्या अात्मसन्मानासाठी नक्कीच सोपटे यांच्या विरोधात काम करतील, असा दावाही खलप यांनी यावेळी केला.