दिवसाकाठी शेकडो लिटर पाणी वाया
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : मांगोरहिल येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या लगतच्या पदपथावर असलेल्या जलवाहिन्याच्या व्हॉल्वमधून सातत्याने पाण्याची गळती होत आहे. तथापी ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ असा संदेश देणाऱ्या पाणी पुरवठा खात्याला त्याची दुरुस्ती करण्यास वेळच नसल्याचे दिसून येत आहे. दिवसाकाठी शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या व्हॉल्वमधून गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याची गळती होत आहे. त्याची दुरुस्ती का करण्यात येत नाही हे समजण्यास मार्ग नाही. व्हॉल्वमधून पाण्याची गळती होऊन पाणी रस्त्याच्या कडेला जमा होत असल्याने तेथे चिखल तयार झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असे संदेश देणाऱ्या पाणी पुरवठा खात्याकडून अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत आहे. त्याला कोण जबाबदार आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधितांनी पाण्याची होणारी नासाडी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.