कर्नाटक निकालाचा संदेश

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात आणि त्यानंतर किती विरोधक एकत्र राहातात, त्यावर देश पातळीवरील जनतेचा कौल अवलंबून आहे असे म्हणता येईल.

Story: अग्रलेख |
08th November 2018, 06:00 am

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, विरोधकांच्या एकजुटीचा भाजपला दणका बसल्याचा निष्कर्ष प्रसार माध्यमांनी काढला. त्यापुढे जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीची दिशा यामुळे स्पष्ट होत आहे, असेही म्हटले गेले. एकाच राज्यातील पाच पोटनिवडणुकीचे निकाल देशाचा कल दर्शवितात असे म्हणणे चुकीचे ठरेल. याचा अर्थ विरोधकांचे एेक्य प्रभाव टाकू शकत नाही किंवा भाजपचे भवितव्य उज्ज्वल आहे असा होत नाही. उलट या निकालाने विरोधी पक्ष एकत्रित आल्यास ते भाजपला नामोहरम करू शकतात असा संदेश या निकालांनी दिला आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. तसे पाहाता, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल (से) यांची आघाडी सत्तेवर आहे. एच.डी. कुमारस्वामी मे महिन्यांत सत्तेवर आल्यानंतरचा काळ अल्प असला तरी त्यांची राजवट जनतेला मानवली आहे, असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. भाजपच्या केंद्रातील कारभाराबाबत जनतेने व्यक्त केलेली नाराजी या निकालात दिसून आली की स्थानिक भाजपचे नेतृत्व कमी पडले यावर आता त्या पक्षात चिंतन सुरू होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुराप्पा आपले वर्चस्व असलेला मतदारसंघ राखू शकले तरी रेड्डी बंधूंचा बेळ्ळारी मतदारसंघ २०१४ मध्ये विजय मिळवून आता मात्र गमावला आहे. पाचपैकी चार जागा विरोधकांकडे गेल्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल जनता समाधानी नाही, असेच दिसून आले आहे. यामुळे कदाचित येडियुराप्पांना नेतृत्व सोडावे लागू शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी असा बदल संभवतो. येडियुराप्पा आणि रेड्डी बंधुंचे आता जनतेवर वजन राहिलेले नाही, असेच या पोटनिवडणुकींनी दाखविले आहे.
काँग्रेसने प्रादेशिक पक्षाशी संधान साधल्यास भाजपशी टक्कर देणे अशक्य नाही, असेच कर्नाटकमधील निकालांनी दाखवून दिले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात आणि त्यानंतर किती विरोधक एकत्र राहातात, त्यावर देश पातळीवरील जनतेचा कौल अवलंबून आहे असे म्हणता येईल. त्या निकालात जनमताचा कल कोणत्या बाजूने आहे, वारे कोणत्या दिशेने वाहात आहे, ते स्पष्ट होईल. कर्नाटकमधील निकाल पूर्णपणे भाजपच्याविरोधात गेले आहेत, असे म्हणून आताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. रामनगर आणि मंड्या या जागांवर भाजपने विजय प्राप्त केला नसला तरी त्या दोन्ही ठिकाणी या पक्षाच्या मतांमध्ये भरघोस वाढ झालेली दिसते आहे. बेळ्ळारीत विरोधी आघाडीने दणदणीत बाजी मारली आहे. रामनगरचा विरोधकांचा विजय हा चंद्रशेखर हे भाजपचे उमेदवार एेनवेळी माघारी काँग्रेसमध्ये परतल्याने होऊ शकला. त्यामुळे विरोधकांनी कर्नाटकमधील विजयाने हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. एक मात्र खरे की विरोधकांनी एकत्र येण्याचे ठरविले तर ते भाजपला दणका देऊ शकतात हेही कर्नाटकमध्ये दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कर्नाटकमधील निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांची मात्र कसोटी यात लागली, ज्यात ते अपयशी ठरले. ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावरील नेते मग ते काँग्रेसचे असोत किंवा भाजपचे, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतील, त्यावेळी देशासमोरील मुद्दे उपस्थित होतील आणि मतदारांचा कस लागेल हे मात्र खरे.