खाणप्रश्नी सरकारकडून जनतेचा बुद्धिभेद

काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांचा आरोप; प्रश्न सोडवा अन्यथा सत्ता सोडा !


14th June 2018, 01:45 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होऊन चार महिने उलटले तरीही याविषयी तोडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. खाणप्रश्नी तोडगा काढण्याची परस्परविरोधी वक्तव्ये विविध सत्ताधारी नेते करत असून त्यांतून खाण अवलंबितांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप आघाडी सरकारला खाणप्रश्न सोडवता येत नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी जेणेकरून काँग्रेसकडून हा विषय सोडवला जाईल, असे आव्हान प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी दिले.       

पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. यतीश नाईक बोलत होते. यावेळी सिद्धनाथ बुयांव, अमरनाथ पणजीकर आणि संकल्प आमोणकर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होऊन चार महिने उलटले. प्रारंभी नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी वटहुकूम जारी होईल, असे सांगितले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी फेरविचार याचिका दाखल करून प्रश्न सोडविण्याचे वचन दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून न्यायालयीन मार्गाने प्रश्न सोडवला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. आता कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे सरकार हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे सांगत आहेत. या वक्तव्यांचा आढावा घेतल्यास सरकारचे याविषयी अद्याप एकमत झालेले नाही हेच दिसून येते, असा टोला अॅड. नाईक यांनी हाणला.        

खाण अवलंबितांवर आर्थिक संकट आेढवले आहे. तत्काळ तोडगा काढून त्यांना दिलासा देण्याचे सोडून सत्ताधारी नेते खोटी आश्वासने देऊन त्यांची फजिती करत अाहेत. सरकारने अधिकृत पद्धतीने आपली भूमिका जाहीर करावी आणि खाणप्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल, याची माहिती जनतेसमोर ठेवावी, असे आवाहनही अॅड. यतीश नाईक यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत स्थापन केलेली मंत्रिमंडळ सल्लागार समिती ही फार्स असल्याचे स्पष्ट झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार       

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्यात परतणार असल्याच्या वार्तेचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले. त्यांच्या आरोग्याची काळजी सगळ्यांनाच आहे आणि ते बरे होऊन ताबडतोब त्यांनी प्रशासनाचा ताबा घ्यावा, अशी अपेक्षा काँग्रेस बाळगत असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी दिली. प्रदेश काँग्रेसतर्फे त्यांची भेट घेतली जाईल, तसेच त्यांच्या आरोग्याबाबत विचारपूस करून त्यांना तत्काळ गुण मिळावा यासाठी प्रार्थना करणार असल्याचेही ते म्हणाले.