जैव संपदा, मच्छीमार समाजावर मोठा परिणाम
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या माध्यमातून मयडे नदीचे खोदकाम राज्यातील झाल्यास गावातील जैव संपदा व मच्छीमार समाजावर मोठा परिणाम होईल. त्यामुळे मयडे नदीला इनलँड रिव्हर कायद्यानुसार राष्ट्रीयीकरणातून वगळावे, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
सरपंच रिया बेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत लुझीलिया डिसा व इतरांनी मयडे नदीला राष्ट्रीयीकरणातून वगळण्याची लेखी मागणी केली. राज्यातील इतर नद्यांबरोबर मयडेतून वाहणाऱ्या तार-म्हापसा नदीचेही राष्ट्रीयीकरण सरकार करणार आहे. या नदीचे राष्ट्रीयीकरण झाल्यास गावच्या जैव संपदेला तसेच सौंदर्याला बाधा येईल. मच्छीमारी समाजाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा डिसा यांनी केला.
मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या (एमपीटी) प्रोजेक्शन अहवालानुसार प्रकल्पात दर दिवशी ६० मिलियन कोळशाची हाताळणी होणार आहे. सध्या रेल्वेमार्गे काेळशाची वाहतूक केली जाते. आता जे महामार्गाचे रुंदीकरण चालले आहे ते वाढीव कोळशाच्या वाहतुकीसाठीच आहे. शिवाय नदी पात्रातून कोळसा वाहतूक करण्यासाठी नद्यांचे राष्ट्रीयीकरण चालविले आहे, अशी माहिती दिली. यामुळे गावाच्या पर्यावरणावर विपरित परिणाम होईल. त्यामुळे मयडे-तार म्हापसा नदीला राष्ट्रीयीकरणातून वगळण्यात यावे व त्यासाठी ठराव घेण्याची सूचना डिसा यांनी केली. त्यानुसार ठराव घेण्यात आला.