साळ स्वच्छतेसाठी केंद्राकडून ६०.३१ कोटी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती : लवकरच कामाला सुरुवात


14th February 2018, 02:47 am
साळ स्वच्छतेसाठी केंद्राकडून ६०.३१ कोटी

प्रतिनिधी | गोवन वार्ता      

पणजी : प्रदूषणामुळे अखेरचा श्वास घेणाऱ्या  सासष्टीतील साळ नदीला पुनर्वैभव प्राप्त होणार आहे. गाळाने भरलेली ही नदी स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने ६०.३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.

कचरा आणि सांडपाण्यामुळे साळ नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीतील गाळ उपसण्यासाठी माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी भाजप सरकारकडे पाठपुरावा करून गाळ उपसण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी साळ नदीतील उत्तर-खारेबांद पूल ते तळावली वार्का नवीन पूलपर्यंतचे ड्रेजिंग करून गाळ काढण्यासाठी मागील सरकारच्या काळात पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी ३४ लाख १० हजार रुपये मंजूर केले होते. त्यांतील ३ कोटी ७६ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे संबधित यंत्रणेने नदीतील गाळ उपसण्याचे  काम सुरू केले होते. दरम्यान, ७ जुलै २०१७ रोजी कॅप्टन ऑफ पोर्टस यांनी दोना पावला येथील एनआयओ संस्थेला साळ नदीचे ड्रेजिंग केल्यास पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास करण्याचे काम सोपविले होते. त्यासाठी ९५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले होते.       

विधानसभा निवडणुकीनंतर नदीतील गाळ उपसण्याचे काम अर्धवट राहिले आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये कचर्‍याचे प्रमाण वाढत आहे. आता केंद्र सरकारने या नदीतील गाळ उपसण्यासाठी ६०.३१ कोटी रुपये मंजूर केले असल्याने या नदीला लवकरच मोकळा श्वास घेता येणार आहे.