तळावलीत विष पाजल्याने १२ म्हशी मृत


09th February 2018, 06:01 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : तळावली-नावेली येथील बागायतीतील भाजीपाला खाऊन नासाडी करीत असल्याने एका शेतकऱ्याने म्हशींना विष पाजल्याने १२ म्हशी मृत्युमुखी पडल्याची घटना झाली. या प्रकरणी एरिक डिसिल्वा या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सुझेला फेर्रांव या महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील संशयित आरोपीची तळावली येथे कृषी बागायत असून त्याने बागायतीत भाजापाल्याची रोपणी केली आहे. तळावलीतील बऱ्याच म्हशी त्यांच्या बागायतीत जाऊन भाजीपाल्याची नासाडी करीत असल्याने त्यांनी गेल्या आठवड्यात बागायतीत खावडीत विष ठेवले होते. सोमवारी बागायतीत आलेल्या म्हशींनी विषबाधक खावड खाल्ल्याने ७ म्हशी मृत झाल्या होत्या. बुधवारी ३ म्हशी मृत झाल्या. तर गुरुवारी आणखी २ मिळून एका आठवड्यात १२ म्हशी मृत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्या बागायतीतील भाजीपाल्याची नासाडी करीत असल्याने म्हशींना विष पाजल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी वैयक्तिक जामिनावर त्याची सुटका केली.